आत्महत्येचा इशारा देत बळीराजाचा आक्रोश; शासनाने हस्तक्षेपाची मागणी
लासूर स्टेशन : येथे कांद्याच्या दराने अक्षरशः तळ गाठल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून लासूर स्टेशन मार्केट कमिटीमध्ये कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज बाजारात कांद्याला अवघा १०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचा संयम सुटला.
हजारो शेतकरी हजारो क्विंटल कांदा घेऊन बाजारात दाखल झाले होते; मात्र उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याच संतापातून विश्वनाथ कचरू उगले यांनी मार्केट कमिटीच्या मुख्य गेटसमोरच आपला संपूर्ण कांदा रस्त्यावर ओतून निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी आत्महत्येचा इशाराही दिला. उपस्थित शेतकरी व नागरिकांनी त्यांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली.
“शेतकरी पिकवतो, पण भाव मात्र व्यापाऱ्यांच्या हातात”
शेतकरी मोठ्या कष्टाने पीक घेतो, खत, बियाणे, औषधे आणि पाण्यासाठी हजारो रुपये खर्च करतो. दिवस-रात्र मेहनत करून उभे केलेले पीक विक्रीसाठी बाजारात आणल्यानंतर त्यालाच मातीमोल भाव मिळत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
शासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी
कांद्याला हमीभाव द्यावा, बाजारभाव स्थिर ठेवावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा अशा प्रकारच्या संतप्त घटना वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
“जगाला अन्न देणाऱ्या बळीराजालाच न्याय कधी मिळणार?”
हा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.